Monday, 4 November 2024

चारोळी - अक्षय राहो प्रीत


विषय - अक्षय राहो प्रीत

टिकवण्या नाते नात्यामधले 
अक्षय राहो प्रीत आपल्यामध्ये 
नको दुरावा,नको संशय कोणता 
फुलत जाते सहजी विश्वासामध्ये

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Friday, 4 October 2024

कविता पंडीता रमाबाई

स्पर्धेसाठी

काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा आयोजित रा

पंडिता रमाबाई

जन्मगाव गंगमूळ डोंगर वस्ती
म्हैसूर संस्थान मंगलोर जवळी
मातापिता विचार पुरोगामीत्वाचे 
दिली स्त्री शिक्षणाची ओंजळी

संस्कृत व्याकरण, साहित्याचे 
प्रगाढ ज्ञान देन आईवडिलांची
विविध भाषा, प्रकांड पंडित 
कलकत्ता स्थानी कदर बुद्धीची

बिरुदावली सिनेटमध्ये खास
पंडीता व सरस्वती सन्मानाची
आंतरजातीय विवाह करुनी बंड
छेडले बालविवाह,पुनर्विवाह बंदीची

आर्य महिला समाज स्थापना 
मदतीसाठी त्याज्य भगिनींच्या
पत्करला रोष समाजाचा एकटीने
धैर्याने सामोरे गेल्या विरोधी रुढींच्या

घेण्या प्रगत ज्ञान भाषा इंग्रजीचे
घेण्या शिक्षण वैद्यकशास्त्राचे 
सोडला देश अन् रवाना इंग्लंडला
विचार पटले तेथे येशू ख्रिस्ताचे

रोष पत्करून सनातन्यांचा 
धर्मांतर केले ख्रिस्ती धर्माचे 
शारदा सदन विधवांसाठी खास
मोल जाणूया रमाईच्या कर्माचे

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Saturday, 21 September 2024

चित्र चारोळी



रत राधा माधव वाजे अलगुज
काया सकवार पुष्पांनी सजली
कीरीट मोरपीशी शिरी शोभते
ऐकुन मुरली सखी मनी फुलली

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

चारोळी


विषय - क्षितीज रेषा 
( आयुष्य रेषा )

फसवते मना ती क्षितीज रेषा
भासमान जणू जवळी येते
जशी लांबते आयुष्य रेषा 
पुढे पुढे हरवत जाते 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Monday, 4 March 2024

कीड

कीड

हळूहळू पोखरत नष्ट करते,
होत्याच नव्हतं होऊन जाते.
कीड लाकडाची माहिती होती,
मनाला,शरीराला स्पष्टच दिसते.

औषधांचा मारा लागतो करावा,
गेली तर जाते,समुळ नष्ट होते.
उपाय मनावर सापडत नाही,
गर्दी विचारांची अशीच तुंबते

रचना
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
९८८१८६२५३०

Saturday, 2 March 2024

21व्या शतकातील स्त्री

21 व्या शतकातील स्त्री

घे तुझ्या कर्तुत्वाची भरारी
अष्टपैलू तू दुर्गाभारी
सरस्वतीच्या आशीर्वादाने
पावले लक्ष्मीची आली दारी

हे सुवचन सार्थ करणारी आजची स्त्री आज सर्वत्र सर्व क्षेत्रात दैदिप्यमान यश शिखर गाठत असताना आपल्याला दिसत आहे. आपल्या सहनशीलता आणि सोशिकता या गुणांच्या आधारावर ती येणाऱ्या सर्व संघर्षावर सर्व समस्यावर उपाय शोधत आगेकूच करत आहे.आजचे यशाचे बोर्ड सर्वत्र आपण पाहतो त्यामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींच्या फोटोंचे दर्शन जास्त घडते. टक्केवारी मध्ये सुद्धा मुलीच पुढे दिसतात. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? काय मुले अभ्यास करत नाहीत ? अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत ? का त्यांना कशाचीच भीती नाही? शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करत असताना हा फरक मला नेहमी दिसून येतो. शिकवत असताना तर आम्ही सर्वांना सारखेच शिकवत असतो पण मुलांचे शिकण्याकडे लक्ष कमी व दंगा करण्याकडे लक्ष जास्त असते. पण हल्ली मुलींचेही दंगा करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तरीही त्यांची अभ्यासातील गुणवत्ता ही टिकून आहे. यावरूनच स्त्री किती चतुरस्त्र आहे हे दिसून येते.

21 व्या शतकातील स्त्री ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा या सर्वांचे रूप धारण करत समाजात वावरत असताना दिसते. आदिकालापासून आत्ताच्या विज्ञान युगापर्यंत स्त्री शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच गेले आहे व त्याचा उपयोग स्त्रीने पुरेपूर करून घेतलेला आहे. ज्ञानसागरातील विचार मोत्यांचा वापर करून आजची लक्ष्मी अर्थार्जनासाठी बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यापासून संध्याकाळी परत घरात येईपर्यंत तिला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श,विचित्र व अर्थपूर्ण नजरांचा सामना करत तिला आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत नाकी नऊ येतात. हा अनुभव निम्म्या स्त्री जातीला तर येतोच. आजच्या वाढत्या महागाईमुळे घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही काम करत असतील तर घरातील सर्व लोकांच्या गरजा,मुलांचे शिक्षण हे सहजी पूर्ण होते अन्यथा आर्थिक ओढाताण निर्माण होते. त्यासाठी तिला नोकरी ही करावीच लागते. नोकरी करत असतानाच बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळत, घरच्या जबाबदाऱ्यांच्या बरोबर मुलांची, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही तिच्यावरच येते. आपल्या मुलांची जडणघडण चांगल्या दृष्टीने व्हावी यासाठी स्त्री अथक  प्रयत्न करत असते. पण तिच्या या कष्टाची जाणीव किती जणांना असते? हल्ली सुशिक्षितता व सुधारणा झाल्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये स्त्रीला मानाचे स्थान मिळत आहे. पण हे बोटावर मोजण्यापुरतेच आहे.

आज कित्येक घरकाम करणाऱ्या मजदूर महिला कष्टाची कामे करत असतात व स्वतःचे घर चालवत असतात. त्यांच्या घरी त्यांचा नवरा आरामात बसून बायकोचे पैसे खर्च करत असतो. तिला पैसे नाही दिले तर मारहाण करतो व जबरदस्तीने तिच्याकडून पैसे काढून घेतो असे चित्रही आपल्याला दिसून येते. पण अन्याय ,अत्याचार सहन करण्यालाही सीमा असते प्रसंगी हा त्रास सहन न होऊन शेवटी स्त्री  दुर्गा,काली चे रूप धारण करते व स्वयं शासनाने तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करते. स्त्रियांच्या साठी अनेक कायदेही आहेत पण त्याचा उपयोग प्रत्येक स्त्रीने योग्य रीतीने केला पाहिजे.

एवढे असून सुद्धा आज समाजामधली परिस्थिती पाहता संस्कारात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत का असे वाटत आहे कारण अनेक तरुण मुली वाईट मार्गाला लागत आहेत तर काही आपल्या आई-वडिलांना सोडून नुकताच ओळख झालेल्या मुलाबरोबर पळून जात आहेत. त्यांना आपल्या आई वडिलांच्या मानसन्मानाबद्दल  कुठल्याही प्रकारची भावना मनामध्ये येत नाही. तसेच अनेक स्त्रियांच्या बद्दल आपण वर्तमानपत्रकामध्ये बातम्या वाचत असतो की आपल्या लहान मुलांना सोडून आपल्या प्रियकराबरोबर त्या पळून गेलेल्या आहेत. अशी कशी परिस्थिती बदलत गेली ? हा एक मोठा प्रश्नच आहे. माझ्या मते असे होणे हे अत्यंत चुकीचे आहे,लाजिरवाणे आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने मनापासून याचा विचार करून योग्य रीतीने राहिले पाहिजे तरच आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार होतील.परवाच सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला.त्यामध्ये नशेत चूर असणाऱ्या मुली पाहिल्या व मनात चर्र झाले.कुठे चाललाय आपला समाज? 

हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे.यासाठी सर्वांनी एकमेकांना दोष देण्याऐवजी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.आपल्या लाडक्या मुला-मुलींचे फालतू लाड न करता प्रसंगी कठोर झाले पाहिजे.आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे सोडले पाहिजे.नाहीतर येणारा भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही.गेलेली वेळ परत येणार नाही.तेंव्हा सर्वांनी वेळीच सावध व्हावे. २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पाल्याला खासकरून मुलींना सक्षम बनवा.समाजाची मानसिकता बदलायला हवी.तरच स्त्री बिनधास्त फिरु शकेल.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
हेरवाड हायस्कूल हेरवाड
९८८१८६२५३०

Tuesday, 27 February 2024

आठवणीतील दरवळ

विषय- आठवणीतला दरवळ

8 मार्च 2021 आंतरराष्ट्रीय महिला दिन..मजरेवाडी येथे संपन्न झाला.. कार्यक्रमात मला मार्गदर्शन करायला येण्यासाठी विद्यार्थीनींच्या पालकांचा फोन आला.मला माझ्या विद्यार्थीनींनी बोलावले होते.पण वेळ संध्याकाळी उशिरा असल्याने मी जायचे टाळत होते,पण त्यांचा आग्रह मला मोडवता आला नाही.ते म्हणत होते,"मॅडम काहीपण करा पण कार्यक्रमाला याच,तुमच्या विद्यार्थीनींचे कौतुक करायला तरी या " ही मात्रा लागू पडली.मी होकार दिला व त्यांना म्हणाले," कार्यक्रम लवकरात लवकर संपवा,कारण माझी मुलगी आली आहे माहेरला,तिच्याबरोबर मला वेळ घालवायचा आहे." त्यांनी होकार दिला म्हणून मी आईला बरोबर घेऊन तिथे बरोबर वेळेत पोहचले.विद्यार्थीनीने आदराने स्वागत केले.बाकी विद्यार्थीनींचे मातापालकसुद्धा आले,"काय  मॅडम,कसं हाय? सगळं बरं हाय ना? " आस्थेने चौकशी करु लागल्या.त्यांच्या नजरेतील कौतुक व प्रेम सर्व काही सांगून गेले.कार्यक्रमाची चौकशी केली असता समजले की, गेले दोन दिवस विविध स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण व माझे मार्गदर्शन होते.आगत- स्वागतानंतर कार्यक्रम सुरू झाला.स्टेज वगैरे काही नव्हते.जमिनीवर टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या.समोर सर्व गटातील स्त्रिया,युवती,लहान मुली होत्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने मी येणार म्हणून हजर होत्या.सर्वजण आपुलकीने चौकशी करत होत्या, " मॅडम,कशा आहात?,कीती दिवसांनी भेटलात..आम्हाला खूप आनंद झाला बघा तुम्हाला भेटून.मुलगी कशी आहे?कुठे आहे?मुलगा काय करतो? " नाना प्रश्न.... सर्वांना मी उत्तरे देत होते.," सर्व छान आहे, तुमचं कसं काय चाललयं? काय करताय सध्या सगळ्या? " यावर सर्वांनी माहिती सांगीतली.त्या पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद व समाधान व माझ्याबद्दलचा आदरभाव दिसला ते पाहून मी कृतकृत्य झाले.एका शिक्षकाला आणि दुसरे काय पाहिजे...?  शाळेत तर सर्व आदर करतात पण शाळा सोडून गेल्यानंतर शिक्षकांच्या बद्दलचा आदर टिकणे हे आज दुर्मिळ झाले आहे. पण मला ते पहायला मिळाले. शिवाय दुसरा आनंदाचा क्षण असा की, कार्यक्रमाचे सर्व नियोजन माझ्या विद्यार्थीनींनी केले होते.त्या विद्यार्थीनी जेंव्हा शाळेत होत्या त्यावेळी मी सांस्कृतिक विभाग प्रमुख असल्याने सर्व नियोजन माझ्याकडेच असायचे.हे सर्व त्यांनी अतिशय बारकाईने निरीक्षण केले होते हे आजच्या कार्यक्रमात मला दिसून आले. आज मला वेगळेच समाधान मिळाले.विद्यार्थ्यांची निरिक्षण शक्ती,त्यांनी माझे केलेले अनुकरण मला दिसून आले .मला खूप आनंद झाला.मी एक शिक्षिका म्हणून यशस्वी झाले असे मला वाटले.विद्यार्थीनींनी माझ्याबद्दल, शाळेबद्दल आपले विचार प्रकट केले,मला भरुन आले.कार्यक्रमाला आले नसते तर हे मला बघायला मिळाले नसते. सात ते आठ वाजेपर्यंत फक्त थांबणार असे सांगून मी आले होते पण कधी नऊ वाजले कळलेच नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत होते.बस..मला आणखी काही नको. माझ्या विद्यार्थीनी अशाच यशस्वीपणे, धाडसाने यशाची शिखरे गाठू देते.त्यांच्याबरोबर मीही आपोआप मोठी होईन....हा आत्मविश्वास मनात ठेऊनच परत निघाले.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530