21 व्या शतकातील स्त्री
घे तुझ्या कर्तुत्वाची भरारी
अष्टपैलू तू दुर्गाभारी
सरस्वतीच्या आशीर्वादाने
पावले लक्ष्मीची आली दारी
हे सुवचन सार्थ करणारी आजची स्त्री आज सर्वत्र सर्व क्षेत्रात दैदिप्यमान यश शिखर गाठत असताना आपल्याला दिसत आहे. आपल्या सहनशीलता आणि सोशिकता या गुणांच्या आधारावर ती येणाऱ्या सर्व संघर्षावर सर्व समस्यावर उपाय शोधत आगेकूच करत आहे.आजचे यशाचे बोर्ड सर्वत्र आपण पाहतो त्यामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींच्या फोटोंचे दर्शन जास्त घडते. टक्केवारी मध्ये सुद्धा मुलीच पुढे दिसतात. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? काय मुले अभ्यास करत नाहीत ? अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत ? का त्यांना कशाचीच भीती नाही? शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करत असताना हा फरक मला नेहमी दिसून येतो. शिकवत असताना तर आम्ही सर्वांना सारखेच शिकवत असतो पण मुलांचे शिकण्याकडे लक्ष कमी व दंगा करण्याकडे लक्ष जास्त असते. पण हल्ली मुलींचेही दंगा करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तरीही त्यांची अभ्यासातील गुणवत्ता ही टिकून आहे. यावरूनच स्त्री किती चतुरस्त्र आहे हे दिसून येते.
21 व्या शतकातील स्त्री ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा या सर्वांचे रूप धारण करत समाजात वावरत असताना दिसते. आदिकालापासून आत्ताच्या विज्ञान युगापर्यंत स्त्री शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच गेले आहे व त्याचा उपयोग स्त्रीने पुरेपूर करून घेतलेला आहे. ज्ञानसागरातील विचार मोत्यांचा वापर करून आजची लक्ष्मी अर्थार्जनासाठी बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यापासून संध्याकाळी परत घरात येईपर्यंत तिला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श,विचित्र व अर्थपूर्ण नजरांचा सामना करत तिला आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत नाकी नऊ येतात. हा अनुभव निम्म्या स्त्री जातीला तर येतोच. आजच्या वाढत्या महागाईमुळे घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही काम करत असतील तर घरातील सर्व लोकांच्या गरजा,मुलांचे शिक्षण हे सहजी पूर्ण होते अन्यथा आर्थिक ओढाताण निर्माण होते. त्यासाठी तिला नोकरी ही करावीच लागते. नोकरी करत असतानाच बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळत, घरच्या जबाबदाऱ्यांच्या बरोबर मुलांची, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही तिच्यावरच येते. आपल्या मुलांची जडणघडण चांगल्या दृष्टीने व्हावी यासाठी स्त्री अथक प्रयत्न करत असते. पण तिच्या या कष्टाची जाणीव किती जणांना असते? हल्ली सुशिक्षितता व सुधारणा झाल्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये स्त्रीला मानाचे स्थान मिळत आहे. पण हे बोटावर मोजण्यापुरतेच आहे.
आज कित्येक घरकाम करणाऱ्या मजदूर महिला कष्टाची कामे करत असतात व स्वतःचे घर चालवत असतात. त्यांच्या घरी त्यांचा नवरा आरामात बसून बायकोचे पैसे खर्च करत असतो. तिला पैसे नाही दिले तर मारहाण करतो व जबरदस्तीने तिच्याकडून पैसे काढून घेतो असे चित्रही आपल्याला दिसून येते. पण अन्याय ,अत्याचार सहन करण्यालाही सीमा असते प्रसंगी हा त्रास सहन न होऊन शेवटी स्त्री दुर्गा,काली चे रूप धारण करते व स्वयं शासनाने तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करते. स्त्रियांच्या साठी अनेक कायदेही आहेत पण त्याचा उपयोग प्रत्येक स्त्रीने योग्य रीतीने केला पाहिजे.
एवढे असून सुद्धा आज समाजामधली परिस्थिती पाहता संस्कारात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत का असे वाटत आहे कारण अनेक तरुण मुली वाईट मार्गाला लागत आहेत तर काही आपल्या आई-वडिलांना सोडून नुकताच ओळख झालेल्या मुलाबरोबर पळून जात आहेत. त्यांना आपल्या आई वडिलांच्या मानसन्मानाबद्दल कुठल्याही प्रकारची भावना मनामध्ये येत नाही. तसेच अनेक स्त्रियांच्या बद्दल आपण वर्तमानपत्रकामध्ये बातम्या वाचत असतो की आपल्या लहान मुलांना सोडून आपल्या प्रियकराबरोबर त्या पळून गेलेल्या आहेत. अशी कशी परिस्थिती बदलत गेली ? हा एक मोठा प्रश्नच आहे. माझ्या मते असे होणे हे अत्यंत चुकीचे आहे,लाजिरवाणे आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने मनापासून याचा विचार करून योग्य रीतीने राहिले पाहिजे तरच आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार होतील.परवाच सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला.त्यामध्ये नशेत चूर असणाऱ्या मुली पाहिल्या व मनात चर्र झाले.कुठे चाललाय आपला समाज?
हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे.यासाठी सर्वांनी एकमेकांना दोष देण्याऐवजी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.आपल्या लाडक्या मुला-मुलींचे फालतू लाड न करता प्रसंगी कठोर झाले पाहिजे.आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे सोडले पाहिजे.नाहीतर येणारा भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही.गेलेली वेळ परत येणार नाही.तेंव्हा सर्वांनी वेळीच सावध व्हावे. २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पाल्याला खासकरून मुलींना सक्षम बनवा.समाजाची मानसिकता बदलायला हवी.तरच स्त्री बिनधास्त फिरु शकेल.
लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
हेरवाड हायस्कूल हेरवाड
९८८१८६२५३०